ठाणे : वन विभागाने येऊर जंगलातील नैसर्गिक झरे आणि पाणवठे स्वच्छ केल्यामुळे कडाक्याच्या उन्हातही प्राण्यांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय झाली आहे. इतक्या भीषण उन्हातही येथील प्राण्यांना उष्णतेच्या झळा जाणवल्याच्या घटनेची कोणतीही नोंद नसल्याची माहिती वन विभागाने दिली.
गेल्या वर्षी चांगला पाऊस झाल्याने, धरण क्षेत्रासह तलावांमध्ये समाधानकारक पाणी होते; मात्र मागील उन्हाळ्यात येऊरमधील पाणीसाठे आटत असल्याने वन विभागाने जंगलातील नैसर्गिक पाणीसाठे स्वच्छ करून घेतले होते. त्यांचा फायदा पावसाळ्यात होऊन जंगल परिसरातील बहुतांश पाणवठे तुडुंब भरून वाहू लागले होते; मात्र पावसाळा सरल्यानंतरही नैसर्गिक पाणवठे आणि तेथील झरे वन विभागाने विशेष मोहीम हाती घेऊन स्वच्छ केल्याने पाणी खोलवर झिरपले. त्यामुळे जमिनीतील ओलावा टिकून राहण्यास मदत झालीच. शिवाय पाणवठ्यांनी सध्या तळ गाठूनही या भागात बिबटे, चितळ, सांबर, भेकर, माकड, रानडुक्कर, मोर, उदमांजर अशा प्राण्यांना स्वच्छ पाणी उपलब्ध होत आहे.
वन विभागाचे कर्मचारी जंगलाच्या पूर्व आणि पश्चिम या दोन्ही भागातील पाणवठे आत्ताही स्वच्छ करत असून, येथील कचरा वेळोवेळी साफ केल्याने प्राण्यांना स्वच्छ पाणी पिता येते. तसेच त्यामुळे झरे खुले राहण्यासही मदत होत असल्याची माहिती येऊरमधील वन विभाग अधिकारी, वाघमोडे यांनी दिली आहे.
(बातमीतील छायाचित्रे मितेश पांचाळ यांनी काढली आहेत.)